अमली पदार्थांविरोधात कळंबोली पोलिसांची मोहीम तीव्र ‘नशा मुक्त अभियान’मुळे कळंबोलीत अमली पदार्थ माफियांना लगाम
अमली पदार्थांविरोधात कळंबोली पोलिसांची मोहीम तीव्र
‘नशा मुक्त अभियान’मुळे कळंबोलीत अमली पदार्थ माफियांना लगाम
कळंबोली ता 17(बातमीदार) कळंबोली शहर भारताच्या नकाशावर आशिया खंडातील सर्वात मोठे लोखंड पोलाद बाजाराचे शहर असून ओळखले जाते. त्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची घुसखोरी केली होती. या अमली पदार्थांचे समूळ नष्ट करून निश्चितच कळंबोली शहर हे नशामुक्त शहर म्हणून पहिल्यांदा या नवी मुंबईमध्ये पहायला मिळेल येईल असा आत्मविश्वास कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत कदम आणि अमली पदार्थ विरोधी पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांच्या सहकार्यातून नशा मुक्त अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी राजेंद्र कोते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की कळंबोली लोखंड पोलाद बाजार हा मिनी पंजाब बनले असून पाकिस्तानमधून पंजाब मार्गे अमली पदार्थ येत आहेत. या लोखंड पोलाद बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांनी घुसखोरी केली आहे. या बाजारात देशातील विविध राज्यातून येणारे वाहन चालक, तरुण, विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. तरूण नशेच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. कुटुंबाच्या कुटुंब रस्त्यावर येत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नशा मुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. आणि त्याची सुरुवात प्रथम कळंबोली शहरातून झाली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे संदीप निगडे याच्या मदतीने सतत दीड ते दोन वर्षांपासून नशा मुक्त कळंबोली शहर करताना 50 अमली पदार्थ गुन्हेगारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. आता काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके अमली पदार्थ गुन्हेगार आहेत. त्यासाठी येथील नागरिकांनी पुढे यायला पाहिजे.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत कदम यांनी सांगितले की नशेने अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. आपल्या तरुण पिढीला वाचवायची असेल तर नशेची किड आपल्या घरात शिरण्या अगोदर तिला ठेचून काढायची आहे. पण त्यासाठी तुम्हा नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे. ते मिळाले तर नशा मुक्त शहर करायला वेळ लागणार नाही.
युवा देश म्हणून भारत देशाकडे पाहिले जाते. या देशातील युवांना नशेच्या आहारी लोटण्याचे प्रयत्न बाहेरील आसुरी शक्ती करत आहेत. आपल्या युवकांना अमली पदार्थांच्या माध्यमातून बरबाद करण्याचे कुटिल कारस्थान केले जात आहे. युवांना नशेपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना वाचविण्यासाठी नशा मुक्त अभियान हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे याचा अभिमान आहे. कळंबोली आणि परिसरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी याबाबत मी चिंता व्यक्त करून यावर उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना भेटलो होतो. देशाची रक्षा करायला देशाच्या सीमेवरच जायला पाहिजे याची गरज नाही. आपल्या परिसरात आपल्या आजुबाजूला होत असलेल्या देशविरोधात कारवाया याची माहिती पोलिसाना दिली तर ही देशसेवा होईल असे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले. (फोटो)
कोट
कळंबोली शहराला नशामुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी आणि येणारी पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी ‘नशा मुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविले जात आहे. मागील दोन वर्षांत अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनीही पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. समाज आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच कळंबोलीला नशामुक्त शहर म्हणून नवी ओळख मिळेल.
राजेंद्र कोते पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली

संपादक : नितीन जाधव





